न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२ नोव्हें.) :- कामशेत येथील शिवाजी महाराज चौक येथे गेली ३० ते ४० वर्षांपासून हातगाडीधारक फळभाजी विक्रीचा आपला व्यवसाय करत आहेत. नुकतेच कामशेत पोलीस आणि पी. डब्ल्यू. डी. विभागाच्यावतीने अतिक्रमण कारवाई करून त्यांना विस्थापित करण्यात आले आहे.
याविरोधात हातगाडीधारकांनी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतवतीने आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आज शिवाजी महाराज चौकात निर्देशन करून कामशेत पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायत कामशेत शाखेचे उद्घाटन करण्यात आले. पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, प्रदेश सचिव प्रल्हाद कांबळे, जिल्हा अध्यक्ष मल्हार काळे, लोणावळा अध्यक्ष गणेश चव्हाण, तळेगाव अध्यक्ष किरण साळवे, प्रदेश संघटक धर्मराज जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पंचायत अध्यक्ष,कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे म्हणाले की, टपरी, पथारी, हातगाडी धारकांच्या बाजूने केंद्र आणि राज्य सरकारने स्वतंत्र कायदा केला आहे. पुनर्वसन केल्याशिवाय कोणावरही कारवाई करून नये, अशी कायद्यात तरतूद असताना देखील कामशेत येथील हातगाडी, पथारी धारकांवर अतिक्रमण कारवाई करून त्यांना विस्थापित करण्यात आले आहे.
कारवाई केलेल्या सर्व टपरी, पथारी, हातगाडी धारकांचे पुनर्वसन करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी यावेळी दिला कार्यक्रमाच्या संयोजनासाठी नितीन पिंजन, सुनील पवळे, मनोज पाणकर, सुषमा पायगुडे, संतोष चव्हाण, रतन यादव, रामेश्वर सुतार, बेलानी कलंगुटके, अब्रार फकीर बांगी, गणपत शिंदे, संजय लालगुडे, रोहिदास गुरव, मंद चव्हाण, मायाताई संतोष चव्हाण आदींनी सहाय्य केले.