न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (३ नोव्हें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे वाटोळे या भारतीय जनता पक्षाने केले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या काळात आम्ही सर्वांना सोबत घेऊन शहरहिताचे काम केले होते. ऐनवेळी विरोधी पक्षांनाही बरोबर घेऊन त्यांच्या प्रभागतल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना सर्वोतपरी मदत केली होती. अजित पवार रहाटणीतील कामगार परिषदेच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास आले होते. त्याअगोदर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
सर्व राजकीय पक्षांबरोबर आम्ही सलोख्याचे, मित्रत्वाचे संबध जोपासले आहेत व त्यांच्या साथीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आशिया खंडात मानाचे पान आम्ही मिळवून दिले होते, परंतु आज सत्ताधाऱ्यांनी महापालिकेवर कर्जाचा डोंगर उभा करून, या भाजपच्या शिलेदारांनी पिंपरी चिंचवडचा सवता सुबा निर्माण केला आहे. दोन भागात शहराची वाटणी करून शहराचे लचके तोडण्याचे काम या शिलेदारांकडून सुरु असल्याचे मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यानी पत्रकार परिषदेत सांगितले.
सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या हाती केवळ गाजर दिले असून, शहर नियोजन, अनधिकृत बांधकामे, रिंग रोड, कचराप्रश्न, पाणीप्रश्न, पीएमआरडीए कार्यालय पुण्यात नेऊन शहरवासीयांना नाहक त्रास दिला आहे. आम्ही नागरिकांना कधीच त्रास दिला नाही, तीव्र दुष्काळातही पाण्याची कमतरता नागरिकांना जाणवू दिली नाही. भाजपने विस्कटण्याचे काम केले आहे. कच-यात रिंग झाल्याचे स्वपक्षिय खासदार सांगत असतानाही मुख्यमंत्री या बाबीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेस माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, राजू मिसाळ, श्याम लांडे आदी उपस्थित होते.