न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (३ नोव्हें.) :- रहाटणी येथील कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने रहाटणी येथील थोपटे लौन्स येथे कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कामगार परिषदेचे उदघाटन किमान वेतन सल्लागार मंडळांचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित कामगार संघटना व कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकार कामगारांच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. केंद्र सरकारच्या कारभारामुळे कारखानदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे कंपनीतील कंत्राटी कामगार, शिकाऊ कामगार देशोधडीला लागली आहेत. या क्षेत्रात संघटीत कामगार कमी आहेत त्यामुळे त्यांची संघटीत शक्ती कमी झाली आहे.
आज देशात ६० टक्के कामगार किमान वेतन कायद्यापासून वंचित आहेत. कामगारांसाठी कंत्राटी कामगार नियमन कायदा केला असून सत्ताधारी पक्षाने त्याची व्यवस्थित अंमलबजावणी केली नाही. तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संस्थेवर शासनाने अद्याप पर्यंत एकही गुन्हा दाखल केलेला नाही. एच.ए. कंपनीच्या कामगारांना गेल्या १७ महिन्यांचा पगार मिळाला नाही. मुळातच केद्र सरकारकडून या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही. कामगारांच्या कुटुंबियांनी जगायचे कसे. आदी मागण्यांसाठी दि. ८ व ९ जानेवारीला कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये कामगारांच्या प्रश्नांसाठी मी स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, राजू मिसाळ,डब्बू आसवानी, अरुण बोऱ्हाडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, कॉम्रेड अजित अभ्यंकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.