न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ५. नोव्हें) :- रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात माजी विद्यार्थी सह विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने ही सभा संपन्न झाली. याप्रसंगी बोलताना विकास राजवाडे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. मी ही त्यातील एक विद्यार्थी असून, रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा वीस वर्षांपूर्वीचा विद्यार्थी आहे. त्यावेळी पांडव नगर याठिकाणी वडारवाडीतील महाविद्यालयात शिकत होतो.
माझ्यासारखे हजारो विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातून शिक्षणासाठी येतात. परंतु त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. अशा वेळेस रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने आमच्यासारख्या सामान्य वर्गातील मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सामावून घेतले. म्हणून आमच्या आयुष्याचे सोने झाले.
आम्ही शिंदे सरकार वाड्यात आल्यावर देखील मोडकळीस आलेल्या खोल्यांमधून आम्ही शिक्षण घेत होतो. आजमितीस या महाविद्यालयाने कात टाकली आहे. आज देखील कर्मवीरांच्या विचारांचा वारसा घेऊन हे महाविद्यालय शहरातील झोपडपट्टी परिसरातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे आजी-माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने व सहकार्याने या महाविद्यालयास मदत करण्याचे आवाहन पै. विकास राजवाडे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, क्रीडा संचालक प्रा. भीमराव पाटील, प्रा. तानाजी हातेकर, प्रा. आसावरी शेवाळे, प्रा.डॉ.शशी कराळे, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. संजय नगर, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. सविता पाटील, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. मयुर माळी प्रा. किरण कुंभार, प्रा.कुशल पाखले आणि बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. डॉ. किरण भिसे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझ्यासारखा सामान्य घरातील मुलगा प्राध्यापक, डॉक्टर होतो. हा या महाविद्यालयाचा बहुमान आहे. त्यामुळे आपण सर्व माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या विकासात सहभाग घेतला पाहिजे. असे मत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थी मुख्याध्यापक विलास घोगरे म्हणाले की, खेळाडूंना रणजी स्पर्धेपर्यंत देण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि महाविद्यालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
त्यामध्ये साहेबराव बनसोडे, वाघमारे सर, सुरेश सोनवणे, भरत मेकाले, गोकुळ ठोसर इतर विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. जेव्हा-जेव्हा आम्हाला महाविद्यालात बोलावले जाईल, तेव्हा-तेव्हा आम्ही महाविद्यालयात येऊ असे अभिवचनही याप्रसंगी दिले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ. विलास सदाफळ म्हणाले की, येत्या काही दिवसात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांच्या समवेत महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी त्यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करावे व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन केले, तर क्रीडा संचालक प्रा. भीमराव पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ आर्थिकच नव्हे तर आपण ज्या- ज्या क्षेत्रात कार्यरत आहात. त्या-त्या क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देऊन सहकार्य करावे. असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी.विभागाच्या चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी महाविद्यालयाच्या नँक मूल्यांकनात माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, त्यांनी अभ्यासक्रमाबाबत सूचना करण्यापासून, संशोधनास प्रोत्साहन देण्यापर्यंत अनेक बाबीत सहभागी व्हावे. असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजय नगरकर यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा. भीमराव पाटील यांनी मांडले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांच्या कल्पनेतून प्रत्यक्षात ही सभा साकार झाली.