न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- लॉक डाऊनमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचे कारण देत पीएमपीएमएल प्रशासनाने चालक, वाहक, वर्कशॉप कामगार व अन्य कामगार अश्या २३०० बदली हंगामी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार दिला नाही. तर, काही कामगारांची सुमारे ८० टक्के पगार कपात करण्यात आली आहे.
रोजंदारी कामगारांचे मे महिन्यातील पगाराची व भविष्यातील कामाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. हे रोजंदारी कामगार सुमारे दहा – पंधरा वर्षांपासून पीएमपीएमएल मध्ये काम करत आहेत. देशात कोरोनचे संकट असताना या कामगारांचा पगार न करणे अथवा पगारात मोठी कपात करणे अत्यंत चुकीचे आहे.
पीएमपीएमएल प्रशासनाने हंगामी रोजंदारी कामगारांच्या पगारा बद्दलचा निर्णय घेण्यासाठी व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे किंवा नियमांचे पालन करून बोर्डाची बैठक तातडीने घ्यावी. लॉकडाऊनमुळे वाढलेली महागाई, कामगार कपात, पगार कपात, अन्यत्र नोकऱ्यांची नसलेली उपलब्धता यामुळे कामगारांना व विशेषकरून त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देणे अशक्य होणार आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीकोनातून या २३०० रोजंदारी कामगारांचे पगार करण्यात यावे, अशी मागणी पीएमपीएमएलच्या माजी संचालिका नगरसेविका सिमा सावळे यांनी पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.