न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हें) :- बीड शहरात स्क्रॅप रिक्षा प्रायव्हेट रिक्षा मधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक होत आहे, यामुळे परवानाधारक आणि लायसन्स असणाऱ्या रिक्षा चालकांवर अन्याय होत असून सर्व परवाने घेऊन देखील व्यवसाय होत नाही आणि दुसऱ्या बाजूला परमिट नसताना काही व्यक्ती बिनधास्त रिक्षा चालवत आहेत.
वाहतूक शाखेच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी हप्ते घेऊन पोलीस गप्प बसत आहेत. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या रिक्षावर बीड पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बीड येथील आंदोलनात बाबा कांबळे यांनी दिला. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्यावतीने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी ( दि. १६) रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होता.
रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले की, पुणे, औरंगाबाद येथून चोरी गेलेल्या रिक्षा बीड शहरात व्यवसाय करताना दिसत आहेत. यात स्क्रॅप रिक्षाचा देखील सहभाग आहे. पोलिसांसमोर बिनधास्तपणे या रिक्षा चालत आहेत. पोलीस मात्र हप्ते घेऊन गप्प बसत आहे. बीड येथील बेकायदेशीर वाहतूक त्वरित बंद करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी बाबा कांबळे यांनी पोलीस प्रशासनास दिला.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत बीड जिल्हा अध्यक्ष सुग्रीव शिंदे, सचिव संजय जावळे, प्रभाकर निकम, शेख अजीज, बापू उगले, प्रकाश ससाणे, नवनाथ आवारे, कल्याण पवळे, नितीन डिसले, हबीब खान, महादेव कुलथे, भारत आखाडे, शेख अन्सार, गोपाळ पवार, मुकेश पवळे, दिलीप पवार यांनी उपस्थित राहून मोर्चाचे नेतृत्व केले.