- मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचे मेट्रोच्या महाव्यवस्थापकांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनमुळे मेट्रो प्रकल्पावर काम करणारे परराज्यातील कामगार आणि कर्मचारी काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावी गेले आहेत. यामुळे इथल्या उद्योगांबरोबरच महामेट्रोसमोर एक नवं संकट उभं राहिलंय. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मेट्रोचे काम वेगात सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परप्रांतिय कामगार गावी परतल्यामुळे त्याला खो बसला आहे.
मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या संबधित कंत्राटदाराकडून परप्रांतातीय कामगारांना पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याऐवजी कंत्राटदारांनी राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे गटनेते व मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील लाखो मजूर आपापल्या राज्यात परतले आहेत. ८८० कामगारांच्या सहाय्याने पुणे आणि पिपरी चिंचवड परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु होते. कामगार गावी गेल्यामुळे मनुष्यबळाची कमतरता असल्याने तूर्तास कामाला गती नाही. त्यामुळे महामेट्रोच्या निगडी ते स्वारगेट या मार्गाच्या कामांचा वेग मंदावला आहे.
मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या संबधित कंत्राटदाराकडून मनुष्यबळाची जमवाजमव सुरु करण्याचे काम सुरु असल्याचे समजते. पाटणा, झारखंड व रायपूरमधील कामगार परत आणण्यासाठी मेट्रोच्या कंत्राटदाराने बसेस पाठवल्या आहेत. जर हे कामगार स्वखुशीने आप-आपल्या गावी परत गेले असतील तर, त्यांना परत आणण्याऐवजी आपल्या मराठी माणसांना कंत्राटदाराने संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे भूमीपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे या पत्रात सचिन चिखले यांनी म्हटले आहे.