न्यूज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि. २३ नोव्हें) :- गोइंग डिजिटल” हा टेक्निकल इव्हेंट जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या, ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथे संपन्न झाला. संस्था व बेंटली इन्स्टिट्यूट्स ह्या आय टी प्रॉडक्ट कंपनी मधील करारा अंतर्गत दोन्ही संस्थांनी मिळून ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अपुर्बा त्रिबेदी हे ह्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारून त्रिबेदी हे खास अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून आले होते. तेथे ते बेंटली च्या कार्यालयात ज्येष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असतात. आपणही स्थापत्यभियंता असल्याचे त्रिबेदी ह्यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीस नमूद केले. नवीन तंत्रज्ञान हे बांधकामात कश्या पद्धतीने अमलात आणले जात आहे, हे त्यांनी विविध चित्रफिती आणि छायाचित्रे दाखवून समजावून सांगितले. स्थापत्यभियांत्रिकी ह्या पारंपारीक समजल्या जाणाऱ्या शाखेमध्ये देखील डिजिटल तंत्रज्ञान वापरले जात असून, कोणत्याही प्रकल्पाचा आराखडा निर्माण करण्यापासून ते त्या प्रकल्पाच्या पूर्ततेपर्यंत सगळे काही डिजिटल माध्यमातून अमलात आणले जात असल्याचे सुद्धा, त्यांनी स्पष्ट केले. ऑगमेंटेड रिऍलिटी ह्या तंत्रामार्फत एखादे बांधकाम हे पूर्ण होण्या आधीच त्याचे पूर्ण झाल्यानंतरचे रूप कसे दाखवता येते, हे देखील त्यांनी दर्शवले. आपल्या ओघवत्या शैलीमुळे त्यांनी श्रोत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.
“प्रॅक्टिकल फाउंडेशन डिझाईन विथ स्टॅड फाउंडेशन अडवान्सड” ह्या श्री त्रिबेदी ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण देखील ह्या प्रसंगी झाले. स्थापत्य अभियंत्यांना तसेच स्थापत्याभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्टॅड ह्या सॉफ्टवेअर वर येणाऱ्या अडचणींना लक्षात घेऊन त्यांना क्लिष्ट स्वरूपाची डिझाइन्स स्टॅड वर तयार करणे सोपे जावे अश्या पद्धतीने पुस्तकाची रचना केली असल्याचे त्यांनी नमूद केले. ह्या प्रसंगी असे जाहीर करण्यात आले, की पुढील एका वर्षासाठी संस्थेच्या विद्यार्थ्यांना बेंटलीची सर्व प्रकाशाने “इ – बुक” स्वरूपात विनामूल्य मिळवता येतील.
याप्रसंगी जेएसपीएम संस्थेचे संचालक डॉ. रवी जोशी व डॉ. प्रमोद विटकर, प्राचार्य डॉ. राकेश कुमार जैन, तसेच उप – प्राचार्य प्रा. अविनाश देवस्थळी हे ही उपस्थित होते. ह्या प्रसंगी बोलताना प्रा. जोशी ह्यांनी असे मत व्यक्त केले, की स्थापत्य – अभियांत्रिकीच्या शिक्षकांनी आता कालानुरूप बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानात पारंगत होण्याची इच्छा असेल, तर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा त्यात प्रभुत्व मिळवावे लागेल, असे मत त्यांनी प्रदर्शित केले.
उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेछया देताना “ह्या सामंजस्य करारामार्फत बेंटलीच्या साह्याने संस्थेचे विद्यार्थी यशाची शिखरे पादक्रांत करोत” अशी इच्छा डॉ. विटकर यांनी व्यक्त केली. डॉ. जैन ह्यांनी देखील उपस्थित सर्वांना तंत्रज्ञानात अधिकाधिक पारंगत होण्याचे आणि स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची व्याख्या बदलण्याचे आवाहन दिले.
डॉ. जैन ह्यांच्या समारोपाच्या भाषणाने ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.