न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२०) :- कोरोना मृत्यूदरावरून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह इतर राज्य सरकारची कानउघाडणी केली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांशी त्यांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सवरून संवाद साधत मृत्यूदर कमी करण्यासह आरटी – पीसीआर तपासणी संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.
वरील विविध राज्यांतील सर्वाधिक कोरोनाप्रभावित ३३ जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक योजना तसेच कोरोना व्यवस्थापनाचा आढावा त्यांनी बैठकीतून घेतला. महाराष्ट्रातील पुणे , नागपूर , ठाणे , मुंबई , मुंबई उपनगरे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
कोरोनावर आळा घालण्यासाठी पर्यायाने रोगाच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी सक्रिय रुग्णांचा शोध घेत इतर रोगग्रस्त, वयोवृद्धांवर लक्ष केंद्रित करावे. बाधित भागात पुन्हा भेट देत तेथील प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविण्याची तसेच चाचण्यांचा वेग वाढवित सक्रिय दर ५ टक्क्यांहून कमी करण्याची गरज असल्याचे भूषण यांनी सांगितले.