- ”आत्मनिर्भर भारत” हे नुसते अभियान न राहता लोकचळवळ बनली पाहिजे’ – विक्रांत पाटील..
- देशात स्वदेशीची उत्पादन क्षमता वाढणार – सुशिल मेंगडे..
- भाजयुमोच्या “आत्मनिर्भर भारत” अभियानाचे निगडीत दिमाखात उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जानेवारी २०२१) :- कोरोनाच्या संकटाचा सामना करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले. ‘आत्मनिर्भर भारत’ हे अभियान देशात सुरू करून, देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आणि विशेषतः युवकांच्या उन्नतीसाठी मोठा हातभार लावला. त्यामुळे देशाचा आर्थिक विकास तर साध्य होतच आहे, त्याचबरोबर देशात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीदेखील होत आहे. ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या योजनेच्या माध्यमातून रस्त्यावरील विक्रेता, स्थलांतरित कामगार, पगारदार, लघु उद्योजक याचबरोबर नवउभारी घेण्याचे स्वप्न बाळगणारी आजची तरुण युवा पिढीदेखील स्वतःच्या पंखात बळ निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. मात्र, त्यासाठी हे अभियान न राहता, ती लोक चळवळ बनली पाहिजे. भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सचोटीने प्रयत्न करीत, खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचविली पाहिजे, असे प्रतिपादन भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निगडीतील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात ‘ आत्मनिर्भर भारत ‘ या अभियानाचा शनिवारी (दि. २३) रोजी उद्घाटन समारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या उदघाटन सोहळ्यास भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस सुशिल मेंगडे, प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे व भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
विक्रांत पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशस्वीतेकरीता तळागाळातील लोकांपर्यंत या योजनांची उपयुक्तता व माहिती पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. ही धुरा भारतीय जनता युवा मोर्चाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. युवक जी जबाबदारी अंगावर घेतो ती यशस्वीपणे पार पाडतो, हे सत्य आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते जिद्दीने व चिकाटीने आपले कार्य पार पाडतात हेही अनेकदा सिध्द झाले आहे. हीच मोहीम आता पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत रुजवायची आहे, त्यासाठी सर्वांनी जोमात कामास सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्ष आपणाला योग्य ते मार्गदर्शन व ताकद पुरवील, याची दक्षता मी घेतो.
सुशिल मेंगडे म्हणाले, देशात स्वदेशी उत्पादन क्षमता वाढविण्याकरिता “आत्मनिर्भर भारत” ही महत्त्वाकांक्षी संकल्पना आपल्या पंतप्रधांनानी राबविली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ च्या माध्यमातून त्यांनी वीस लाख कोटींचे महत्त्वपूर्ण पॅकेज देऊन विविध लघु उद्योग, शेती व शेती पूरक व्यवसाय, अन्न प्रक्रिया उद्योग अश्या शेकडो विषयांसाठी मोठया आर्थिक तरतूदी केल्या आहेत. यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडीसुद्धा देण्यात येत आहे. नागरिकांना या उपयुक्त योजनाचा लाभ मिळावा, याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणत जनजागृती होणे गरजेचे आहे.
सुदर्शन पाटसकर म्हणाले की, भाजयुमो ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’च्या माध्यमातून होतकरुन तरुणांशी संवाद साधत आहे. त्यांना आवश्यक योजनांची माहिती दिली जात आहे. आवश्यकता भासल्यास आर्थिक पाठबळ कसे मिळवून देता येईल, याबाबतही सहकार्य करण्याचा प्रयत्न या अनुषंगाने केला जात आहे. त्यांच्या प्रयत्नांना प्रत्यक्ष रुप देण्यासाठी भाजयुमोचे कार्यकर्ते हे अधिकाधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देतील.
अनुप मोरे यांनी पंतप्रधानांनी कोरोना काळात देशाला निर्भीड व अविचल नेतृत्व दिले. त्यांनी देशाला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी ‘ आत्मनिर्भर भारत अभियान ‘ सुरु केले. हे अभियान, उज्वल भारतासाठीचे स्वप्न नव्हे तर संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमोचे कार्यकर्ते अधिकाधिक तरुणांना विविध योजनांचा लाभ मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजक व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी आभार मानले.