- बंदचा प्रत्येक दिवस आर्थिक अडचणीत वाढ करणारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२१) :- गेल्या वर्षीच्या टाळेबंदीचा फटका हॉटेल व्यावसायिक सहन करू शकले नाहीत. वेळेच्या निर्बंधानंतर आता हॉटेल पूर्णतः बंद करण्याच्या निर्णयामुळे आणखी काही हॉटेलला टाळे लागतील. त्यामुळे बंद नको तर निर्बंध घाला, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाचा (कोविड १९) प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये घातलेल्या टाळेबंदीमुळे हॉटेल व्यवसाय सहा महिने ठप्प होता. या काळात शहरातील तीस टक्के हॉटेल बंद पडली. त्यानंतर पन्नास टक्के परवानगी दिली. हॉटेलची वेळ रात्री एकवरून अकरापर्यंत कमी केली. रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर हॉटेलची वेळ दहापर्यंत आणि गेल्या या महिन्यात रात्री आठपर्यंत कमी केली.
हॉटेलच्या एकूण उलाढालीपैकी सत्तर ते ऐंशी टक्के उलाढाल रात्रीच्या वेळेत होते. त्यातही रात्री आठ नउनंतर गर्दी वाढते. त्यामुळे रात्री आठपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देणे म्हणजे टाळेबंदीसारखेच असल्याची प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. बंदचा प्रत्येक दिवस हॉटेलच्या आर्थिक अडचणीत वाढ करणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यवसायिक देऊ लागले आहेत.