- मात्र, लसीचा पुरवठा मर्यादित;१२ कोटी लसीची राज्याला गरज..
- एकरकमी पैसे द्यायचीही आपली तयारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी आपल्यावर टाकली आहे. या वयोगटातले सुमारे ६ कोटी नागरिक आपल्या राज्यात आहेत. म्हणजे आपल्याला १२ कोटी डोस लागणार आहेत. आज जर आपल्याला १२ कोटी डोस कुणी देणार असेल, तर ती रक्कम एकरकमी देऊन ते डोस घेण्याची आपली तयारी आहे.
पण या लसीच्या पुरवठ्याला मर्यादा आहेत. सीरम आणि भारत बायोटेकशी आपण बोलत आहोत. मे महिन्यात आपल्याला १८ लाखांच्या आसपास लसीचे डोस १८ ते ४४ वर्गासाठी मिळणार आहेत. काहींचा गैरसमज झाला असेल की केंद्र सरकार या वयोगटातल्या नागरिकांचंही लसीकरण मोफत करत आहे. पण केंद्राने स्पष्ट निर्देश दिले आहेत, की उत्पादित लसीमधली ५० टक्के केंद्र सरकार घेणार असून उरलेल्या ५० टक्के साठ्यामध्ये राज्य सरकार, खासगी उद्योग समूह यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
उद्यापासून आपण १८ ते ४४ या वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण आपल्याला जसा लसीचा पुरवठा होईल, तसं सुरू करणार आहोत. कालही कोविन अॅप क्रॅश झालं. सर्व राज्यांना आपापली अॅप तयार करण्याची परवानगी केंद्रानं द्यावी. ही सर्व अॅप केंद्र सरकारच्या अॅपशी जोडता येतील. अॅपवर नोंदणी करून लसीकरण जिथे असेल, तिथे आपण जावं. लसीचा पुरवठा मर्यादित आहे. जून-जुलैपर्यंत हे उत्पादन वाढेल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी (दि. ३०) रोजी दिली आहे.