- वारकरी शिष्टमंडळाने घेतली माजी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी ‘ बायो बबल ‘ पद्धतीचा अवलंब करीत, काही निवडक वारकऱ्यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधासह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिले आहेत. कोविडच्या नियमांचे पालन करतानाच हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत सुद्धा खंड पडू नये, असा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यासंदर्भात फडणवीस यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीन, अशी ग्वाही दिली.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बायो बबल (जैव सुरक्षा कवच) पद्धतीने सुरक्षा कवच निर्माण करून पालखी पंढरपूरला न्यावी व परत आणावी. वाटचालीत पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी होऊ नये यासाठी गरज भासल्यास पालखी रथाऐवजी बंदिस्त वाहनातून श्रींच्या पादुका नेण्याची तयारी. वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्यात यावी. वारीत मर्यादित संख्येने वारकऱ्यांना पायी चालण्याची परवानगी मिळावी, अशा मागण्या प्रस्तावात आहेत.