- तज्ञ मार्गदर्शक दत्तात्रय कसाळे व हरप्रीत छाब्रा यांचे मत..
- चाकण एमआयडीसी फेज ३ संघटनेचे उद्योजकांसाठीचे सेमिनार संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२१) :- आगामी काळातील बाजारपेठेचे प्रवाह विचारात घेता “अकाउंटिंग व फायनान्स” या दोन विषयांचे व्यवस्थापन फार महत्वाचे ठरते. उद्योजक व व्यावसायिक संस्थांचे यश हे आर्थिक व्यवस्थापन आणि वित्तीय सेवा या दोन्ही क्षेत्रांच्या योग्य नियोजनावरच अवलंबून असते. किंबहुना, “अकाउंटिंग व फायनान्स” हे उद्योजकता आणि व्यावसायिकतेच्या बहुतेक पैलूंना स्पर्श करते. उद्योजकांचे जग स्पर्धात्मक होत चालले आहे. आधी जगण्यासाठी आणि नंतर स्पर्धेत पुढे राहण्यासाठी आर्थिक स्रोतांसह सर्वच संसाधनांचा सुज्ञ वापर करणारा उद्योजकच या विशाल क्षेत्रात आपली नौका यशस्वीपणे पार करू शकतो, असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक दत्तात्रय कसाळे व हरप्रीत छाब्रा यांनी केले.
चाकण एमआयडीसी फेज ३ उद्योजक संघटनेच्या वतीने नुकतेच चाकण येथील विबग्योर पॅकवेल (VIBGYOR PACKWELL SYSTEMS pvt. ltd). कंपनीत उद्योजकांसाठी “अकाउंटिंग व फायनान्स” या विषयावर व्याख्यान (Seminar) आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते दोघे बोलत होते. यावेळी चाकण एमआयडीसी फेज ३ उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, संघटनेचे संचालक ताम्हाणे, इतर उद्योजक, अकाउंटिंग व फायनान्स संबंधित सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, उद्योजकांची व्यावसायिक कामगिरी आर्थिक व्यवस्थापनावर अवलंबून असते आणि सर्व मध्यम आणि मोठ्या उद्योगांना तज्ज्ञाची गरज भासते. आर्थिक व्यवहारांचा कंपन्यांवर मोठा परिणाम होतो. हे सर्व परिणाम समजून घेण्यासाठी विषयाचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यासांचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून हा विषय विकसित झाला. काम करत असताना काही जोखीम (Risk) देखील पत्कराव्या लागतात. त्यासाठी व्यवस्थापन महत्वाचे आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील अकाउंटिंग व फायनान्सबाबत पद्धतशीरपणे माहिती हवी. त्यासाठी कोणते दाखले (रिपोर्ट) दर महिन्याला तयार करावेत, रोखीचा प्रवाह (कॅश फ्लो) कसा ठेवावा यासाठी सूक्ष्म नियोजनही फार महत्वाचे असते. अन्यथा उद्योजकांपुढील अडचणींचा गुंता वाढत जातो.
संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे म्हणाले, उच्चविद्याविभूषित उद्योजकांना त्यांच्या अचूक कार्यामुळे समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. यशामुळे काही नैतिक आणि वैधानिक कायदेशीर जबाबदाऱ्या त्यांच्यावर वाढत जातात. अनेक प्रकारच्या कायदेशीर बाबी, कागदपत्र व दस्तऐवज यांचे वेळोवेळी नूतनीकरण त्यांना करावे लागते, त्याचा तपशील आणि लेखाजोखा ठेवावा लागतो. त्यासाठी सरकारला नियमितपणे आपल्या संपत्तीचे विवरण, तपशील देणे गरजेचे असते. वैयक्तिक किंवा उद्योजकीय जीवनात हे सर्व स्वत: करणे मोठ्या जिकिरीचे असते. उद्योजकांसाठी त्याच्या उद्योगातील हा खूपच मोठा आणि महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी उद्योजकांना पद्धतशीरपणे विषयांचे मार्गदर्शन व्हावे, याकरिता आमची संघटना प्रत्येक महिन्याला विषयावार सेमिनारचे आयोजन करीत असते, जेणेकरून संघटनेमधील उद्योजक व त्यांचे उद्योग या दोहोंचाही सर्वांगीण विकास होत राहील.
सेमिनारची प्रस्तावना व उपस्थितांचे आभार संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी मानले.