मालक आणि कामगारांमध्ये सुसंवाद साधून कामगारांना कायद्याचे संरक्षण द्या..
राज्य माथाडी सल्लागार समितीच्या बैठकीत कामगार नेते इरफान सय्यद यांची मागणी..
माथाडी कामगारांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य; कामगार मंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- कामगार नोंदणी हा महत्त्वाचा विषय असून या नोंदणीच्या कामाच्या प्रगतीचा अहवाल सल्लागार समितीच्या बैठकीत वेळोवेळी मांडण्यात यावा, असे निर्देश देतानाच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या ऑनलाईन नोंदणीला वेग देण्याचे निर्देश राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची ८३ वी बैठक मंत्रालयात कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस सल्लागार समितीचे सदस्य आमदार भरतशेठ गोगावले, शशिकांत शिंदे, श्रीनिवास वनगा, माजी आमदार नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार प्रतिनिधी सल्लागार समिती सदस्य इरफानभाई सय्यद यांच्यासह विविध आस्थापनांच्या मालकांचे आणि कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसेच विविध माथाडी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
असंघटित कामगार असलेल्या विविध माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून ही पदे भरण्यासाठी आवश्यक आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करतानाच या भरतीमध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याचे निर्देश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कामगार नोंदणीसाठी पोलीस पडताळणी अनिवार्य असून ही पडताळणीची प्रक्रिया माथाडी मंडळाने पार पाडावी यासाठीची शक्यता तपासून घेण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. माथाडी मंडळामध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी नियम तपासून त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही कामगारमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. नवीन माथाडी मंडळाची लवकरच स्थापना होईल मात्र तोपर्यंत जुन्या मंडळाने दिलेल्या निर्देशांवर कार्यवाही सुरु ठेवण्याच्या सूचना देतानाच दर तीन महिन्याला सल्लागार समितीच्या बैठकीत माथाडी मंडळांच्या विविध विषयांचा आढावा घेण्याचे निर्देशही कामगारमंत्र्यांनी यावेळी दिले.
कामगार नेते इरफान सय्यद यांनी बैठकीत माथाडी, हमाल यांसारख्या श्रमजीवी कामगारांच्या नोकरीचे नियमन आणि त्यांच्या नोकरीच्या अटी आणि शर्ती यासाठी अधिक चांगली तरतूदीची मागणी केली. मालक आणि कामगारांमध्ये सुसंवाद साधून कामगारांना कायद्याचे संरक्षण द्यावे. मंडळातील कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीचा अवलंब करावा. सप्टेंबर २०१६ च्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे भरतीमध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य, शासनाचे विविध लाभ मिळण्यासाठी कामगारांना ओळखपत्र व विमा संरक्षण देण्याच्या कामगारमंत्र्यांच्या निर्देशाचे इरफानभाईंनी स्वागत केले.