न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२२) :- मेट्रो ही काही फक्त प्रवासी सुविधा नाही. या सुविधेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी त्यामध्ये वायफाय सुविधा विनामूल्य देता येईल का ते पहा, असे आवाहन यशदाचे संचालक एस. चोकलिंगम यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाच्या ताथवडे कास्टींग यार्डमध्ये ‘ संवाद ‘ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेट्रोचे काम करण्यासाठी स्थापन केलेल्या आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चोकलिंगम म्हणाले, मेट्रोमुळे फक्त शहराच्या नव्हे तर देशाच्याही प्रगतीला मोठा हातभार लागतो. त्यातही पुण्याचे देशाच्या स्तरावर शैक्षणिक केंद्र म्हणून विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच विद्यार्थी तसेच आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मेट्रोत वायफाय सुविधा देता येईल का? यावर प्रशासनाने विचार करावा. डॉ. दिवसे यांनी मेट्रो प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून होत असलेल्या उपक्रमांची विस्ताराने माहिती दिली.