महावितरणाकडून सुरक्षेबाबतचे नियम जारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२२) :- वादळी व संततधार पाऊस, अतिवृष्टी, पूर परिस्थिती, फांद्या कोसळल्याने वीजतारा, विजेची उपकरणे, यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टी, वादळी पाऊस आदींमुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तु, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस, जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात, यामध्ये वीजखांब वाकतात. वीजतारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. फ्यूजतार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातुची तार वापरली पाहिजे. त्यामुळे काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तात्काळ खंडित होतो व संभाव्य धोका टळतो. घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा ॲण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड, कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावे. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल ॲप, www mahadiscom.in वेबसाईटद्वारेही वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार अथवा महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास तक्रार नोंदविली जाईल, असे महावितरणने म्हटले आहे.