- शहराच्या विकासासाठी जनसंवाद महत्वपूर्ण; आयुक्तांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पार पडलेल्या जनसंवाद सभेत आजपर्यंत १ हजार सहाशे तेहतीस नागरिकांनी सहभाग नोंदवत प्रतिसाद दिला आहे. शहराच्या विकासासाठी जनसंवाद सभांची भूमिका महत्वपूर्ण ठरत असल्याची भावना आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. नागरिकदेखील याबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत.
नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी जनसंवाद सभेचा उपक्रम सुरु केला. प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान आणि सक्षमपणे राबवण्यासाठी तसेच विविध महत्वपूर्ण सूचनांचा अंतर्भाव प्रशासकीय कामकाजात करून घेण्यासाठी जनसंवाद सभा प्रभावी माध्यम ठरले आहे. तिसऱ्या जनसंवाद सभेत सर्वाधिक १८१ नागरिकांनी सहभाग नोंदवला, तर नवव्या जनसंवाद सभेत सर्वात कमी ७५ नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला. आजपर्यंत झालेल्या जनसंवाद सभेत ‘ग’ प्रभागात सर्वाधिक ३१६ नागरिकांनी सहभाग नोंदवला तर सर्वात कमी ‘क’ प्रभागात ११२ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
उच्च दाबाने, सुरळीत पाणीपुरवठा करणे, आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, आरोग्य आणि स्वच्छता संबंधी नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविणे अशा तक्रारवजा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या. यातील बहुतांश तक्रारींचे निराकारण क्षेत्रीय स्तरावर तात्काळ करण्यात आले. धोरणात्मक बाबींसंदर्भात असलेल्या सूचनांवर धोरणात्मक निश्चितीकरीता कार्यवाही सुरु करण्यात आली. वारंवार येणा-या तक्रारींवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन केले जात आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर महापालिकेने केलेल्या कार्यवाहीबाबत नागरिकांना अवगत केले जात असून यामाध्यमातून नागरी सुसंवाद वृध्दींगत होत आहे.
दरम्यान, आजच्या जनसंवाद सभेत सुमारे ७९ नागरिकांनी सहभाग घेऊन म्हणणे मांडले. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १५, ६, ५, ५, ९, ४, २५ आणि १० नागरिकांनी आपले म्हणणे मांडले.
‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ हे उपस्थित होते. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, सहशहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत संबंधित सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे शितल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक , विजयकुमार थोरात यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्थापत्य, जलनि:स्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.