- तूर्तास काही तासांची नियोजित पाणी कपात रद्द?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आठ दिवसांत महिनाभराचा बॅकलॉक भरून निघाला असून, गेल्या वर्षीच्या पाण्याची सरासरी गाठली आहे. एकाच आठवड्यात पाणीसाठ्यात ११ टक्क्यांनी वाढ झाली असून, धरणात सध्याचा एकूण पाणीसाठा ३१.०९ टक्के झाला आहे. त्यामुळे महापालिकेने जाहीर केलेली पाणी कपात टळणार असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता. तीन जुलै रोजी धरणात केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो १२ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच होता. त्यामुळे महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन केले होते. यासंदर्भात पाटबंधारे विभागानेही, ‘उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला जावा,’ अशी सूचना करणारे पत्र महापालिकेला पाठवले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीकपातीसंदर्भात निर्णय घेतला होता. त्यानुसार दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवून त्याच्या वेळेत कपात केली जाणार होती. म्हणजेच, तीन व चार तास पाणी मिळणाऱ्या भागात एक तास कपातीचा निर्णय होता. परंतु, आता शहरासह मावळ तालुक्यात आणि पवना धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
धरणात पुरेसा पाणी साठा निर्माण झाल्याने तूर्त पिंपरी – चिंचवड शहरातील नियोजित पाणी कपात झाली रद्द झाली आहे. पवना धरण क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम राहिल्यास धरण १५ ऑगस्टपर्यंत १०० टक्के पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर नियोजित कपात रद्दचा अंतिम निर्णय होईल. आम्ही वेट अॅण्ड वॉच ‘ च्या भूमिकेत आहोत, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.