- वाहतूक कोंडीने जनता त्रस्त; रस्त्यासाठी निधी द्या अन्यथा मोठे जन आंदोलन..
- माजी स्थायी समिती सभापती ममताताई गायकवाड यांचा आयुक्तांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) :- काळेवाडी फाटा येथून मानकरवस्ती मार्गे वाकडसह मुंबई-पुणे महामार्गाकडे जाण्यासाठीच्या रस्त्यावर वाहनांची रांग लागलेली असते. छत्रपती चौक ते मानकर वस्ती दरम्यान, महापालिकेचा सिमेंट रस्ता मंजूर आहे. परंतु, रस्त्यासाठी लेखार्शिषावर तरतूद उपलब्ध नसल्याने तीन महिन्यांपासून नियोजित सिमेंटचा रस्ता अडगळीत पडलेला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या माजी नगरसेवकाच्या जनसंपर्क कार्यालयामोरच प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका प्रशासनाने निधी नसल्याचे कारण सांगत रस्त्याच्या कामास जाणिवपुर्वक विलंब लावला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिक पालिका प्रशासनावर संताप व्यक्त करीत आहेत. महापालिका आयुक्तांनी या सिमेंटच्या रस्त्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, भाजपच्या सत्ताकाळात प्रभाग क्रमांक २६ मधील वाकड-पिंपळे निलखकडे जाणारा काळेवाडी फाटा ते मानकरवस्ती पर्यंतचा सिमेंट रस्ता मंजूर केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने काळेवाडी फाटा ते छत्रपती चौकापर्यंत रस्त्यांचे काम पुर्ण केले आहे. पण छत्रपती चौक ते मानकरवस्ती रस्त्यांचे काम अद्याप अपुर्ण आहे. संबंधित ठेकेदाराने छत्रपती चौकापासून पुढे रस्त्याच्या एकाच बाजूने खोदाई करुन ठेवली आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहनाची ये-जा सुरु आहे. यामुळे रस्त्यावर अतिक्रमण, खड्डे आणि वाहनाची प्रचंड वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, छत्रपती चौक ते मानकरवस्ती पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी स्थापत्य विभागाकडे निधी उपलब्ध नाही, रस्त्याच्या कामासाठी योग्य ती तरतूद न केल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्याला तरतूद नसल्याने ठेकेदारानेही काम अपुर्ण ठेवले आहे. याच रस्त्यावर भाजपच्या माजी नगरसेवकाचे जनसंपर्क कार्यालय असतानाही महापालिका प्रशासनाने रस्त्याचे काम अपुर्ण ठेवले आहे. अपुर्ण रस्त्याबाबत आपण तातडीने लक्ष घालून सिमेंट रस्त्याच्या कामास योग्य ती तरतूद उपलब्ध करावी. तसेच तातडीने ह्या रस्त्याचे काम पुर्ण करुन नागरिक, वाहनधारकांना दिलासा द्यावा. लवकरात लवकर रस्त्याचे काम पुर्ण न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात ममताताईंनी म्हटले आहे.
भाजपच्या सत्ताकाळात छत्रपती चौक ते मानकर वस्ती परिसरात सिमेंटच्या रस्त्याला मंजूरी मिळाली. प्रशासक राजवटीत केवळ निधीच्या कमतरतेमुळे हा रस्ता प्रलंबित राहिला आहे. या कामासंदर्भात प्रशासकांकडे आजपावतो अर्ज-विनंत्या करूनही त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. रस्त्याअभावी मोठी वाहतूक कोंडी होतेय. तसेच अपघाताला देखील आयतेच निमंत्रण मिळतेय. प्रशासकांनी याची वेळीच दखल घेऊन रस्त्यासाठी निधी मिळवून द्यावा. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
– मा. विनायक गायकवाड (माजी नगरसेवक, पिं. चिं. मनपा)…