न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील असंतोषाचे जनक होते. स्वातंत्र्य चळवळीतील लोकमान्य टिळकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, महापालिका कर्मचारी रामदास कटके, विलास शिंदे, प्रशांत जोशी, अंकुश लांडगे आदी उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चळवळीला दिशा दिली. सडेतोड भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी केलेला संघर्ष तरुण पिढीसाठी प्रेरणादायी होता. जाज्वल्य देशाभिमान असणारी पिढी निर्माण करण्यामध्ये लोकमान्य टिळक यांचे नाव अग्रभागी आहे. देशाभिमान असणारी पिढीच आपल्या देशाला बलशाली करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या पिढीने लोकमान्य टिळकांचे चरित्र अभ्यासले पाहिजे असे आयुक्त पाटील यावेळी म्हणाले.