- जनसंवाद सभेत नागरिकांच्या समस्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- अर्बन आऊटकम फ्रेमवर्क २०२२ अंतर्गत करण्यात येत असलेल्या सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या प्रतिक्रिया नोंदवून आपल्या शहराला या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आज झालेल्या जनसंवाद सभेच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले आहे.
जनसंवाद सभा ही नागरिक आणि महापालिका यांच्यातील दुवा ठरत असून विविध प्रश्न, सूचना, तक्रारींच्या माध्यमातून महापालिकेची ध्येय धोरणे, निर्णयांमध्ये नागरी सहभाग वाढवण्यासाठी देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. नागरिकांनी घेतलेला सक्रीय सहभाग, अनुभव, जाणीवा यांचा शहराच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा वाटा आहे. या शहराच्या विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी प्रत्येकाचे निरंतर योगदान आवश्यक असून त्यातूनच शहराचा नावलौकिक वाढणार आहे. सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण देखील नागरी सहभागामुळे यशस्वी होणार असून यामध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत ६४ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १४, ६, ३, ५, ५, ४, १६ आणि ११ नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी, यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शितल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. महापालिकेची क्रीडा मैदाने आणि उद्यानांचा वापर इतर कोणत्याही कारणांसाठी न करण्याबाबत महापालिकेने निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, रस्त्यातील खड्डे बुजवताना उंचवटा तयार होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्य रस्त्यावरील खोल गेलेले चेंबर समतल करावेत, उद्यानात धुम्रपान तसेच अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथक नेमावे, काही महापालिका कर्मचारी बायोमॅट्रीक थम्ब करून विनापरवाना कार्यालयाबाहेर जात असल्याचे निदर्शनास येत असून अशा कर्मचा-यांवर प्रशासनाने कारवाई करावी, पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या भागात जलवाहिन्या टाकण्यात याव्यात, पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, फुटलेल्या मलवाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात, शहरामध्ये विविध ठिकाणी स्थळदर्शक आणि मार्गदर्शक फलक लावावेत, शहरात सार्वजनिक मुतारी आणि शौचालयांची संख्या वाढविण्यात यावी, शहर परिसरात वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, शहरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची वारंवार पाहणी करून नादुरुस्त असलेले कॅमेरे तात्काळ दुरुस्त करावेत तसेच आवश्यकतेनुसार कॅमे-यांची संख्या वाढवावी, अनधिकृत बांधकामे तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, रस्त्यावरील बेवारस वाहने तसेच अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावीत, अशा सूचनावजा तक्रारींचा समावेश आहे.
















