न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानावर मेळावा झाला. या मैदानात लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि माहीम येथील अनधिकृत मजार यावर भाष्य केले. त्यानंतर आज राज ठाकरेंवर समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाजीद राजाक सय्यद नावाच्या एका व्यक्तिने ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुढीपाडवानिमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप केला आहे. मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याची दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात येत आहे. त्यांच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची संभावना असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आपल्या तक्रार अर्जात त्यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांनी मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे हिंदू- मुस्लिम तणाव निर्माण होऊ शकतो. राज ठाकरे यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित सभेत भडकाऊ भाषण केले आहे. मुस्लिम धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचेल असे शब्द वापरण्यात आले आहेत. त्यांनी केलेलं भाषण हे राजकीय दबवातून केले आहे. अशा वक्तव्यांमुळे देशभर दंगली होऊ शकतात, यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, राज ठाकरे यांच्या आगामी सभांना परवानगी देऊ नये, या तक्रारीनंतर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, तसं झाल्यास त्याला राज ठाकरे जबाबदार असतील असंही या तक्रारवाजीद रजाक सय्यद यांनी अर्जात नमूद केलं आहे.