केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र शिंग व मोदी सरकार करणार समस्यांची उकल !
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : रिक्षा-टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय मंत्री जितेंद्र शिंग यांनी नुकतेच देशभरातील रिक्षा टॅक्सी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. देशभरातील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत बैठक घेतली जाईल असे आश्वासन डॉ जितेंद्र शिंग यांनी या शिष्टमंडळास दिले.
या वेळी महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस व कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, भारतीय मजदूर संघाचे नेते राजेंद्र सोनी, जांबू काश्मीर, रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अचल शिंग, अखिल मोटर ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष मधुकर थोरात, नवी मुंबई कृती समितीचे नेते मारुती कोंडे, सुनील बोर्डे, विजय पाटील, श्रीरंग जाधव, विदर्भ रिक्षा फेडरेशनचे मोशविर लोकरे, दीपक दासगाय, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
रिक्षा विमा हप्ता (इन्शुरन्स) मध्ये झालेली वाढ, रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, रेल्वे स्टेशनवर रिक्षा टॅक्सी चालकांची जागा भांडवलदार कंपन्यांना भाड्याने दिली जात आहे, ओला उबेरमुळे रिक्षा व्यावसाय अडचणीत आला आहे, बॅटरी अपरेड रिक्षा या सह विविध प्रश्नांवर या वेळी चर्चा करण्यात आली.