न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च) :- शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी पाहता आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे नियोजन आहे. बंद पाईपलाईनव्दारे पाणी आणण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागतील. शहराची पाण्याची गरज लक्षात घेता तुर्तास इंद्रायणी नदीतून आंद्रा धरणाचे पाणी आणले जाणार आहे. त्यासाठी देहूपासून चिखलीत होणा-या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शहराची सध्याची परिस्थिती पाहता अतिरिक्त पाणीसाठ्याची गरज आहे. यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महापालिकेने शासनाकडे आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीतून शहराला देण्यास परवानगी मागितली होती. त्याला शासनाने तयारी दर्शविल्यानंतर पालिकेकडून पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. इंद्रायणी नदीतून देहू बंधारा येथून महापालिका पाणी उपसा करणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून देहू ते चिखली या साडेसात किमी अंतरासाठी १५०० एमएम व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे.
निवडणूक आचारसंहितेनंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल. त्यासाठी सुमारे ४७ कोटी रुपयांची निविदा काढली जाणार आहे. इंद्रायणीतून आणलेल्या पाण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्र उभारणे व त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली आहे.










