न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च) :- दिवसेंदिवस पाण्याची टंचाई जाणवत असतांना शहरात वॉशिंग सेंटरद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, महापलिका प्रशासनाने वॉशिंग सेंटर तातडीने बंद करावेत, अशी मागणी जागरुक नागरिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात पाणीटंचाई असल्याने शहरवासियांना दिवसातून एकदाच पाणी मिळत असून एक दिवस पाणी बंद ठेवले असतांना काही व्यावासायिक पाण्याचा गैरवापर करत आहेत. आकुर्डी येथील प्राधिकरण रस्त्यावर, गंगानगर नाल्याजवळ, नर्सरीच्या जागेवर नवीन वॉशिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे. यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.
वॉशिंग सेंटरवर एका वाहन धुण्यासाठी किमान १०० लिटर पाणी लागत असून दिवसातून २५ ते ३० वाहने धुतली जातात. यावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संघटनेने अनधिकृत नळजोडणी बंद करावी, नवीन बांधकामांना परवानगी देवू नये, पाणीपट्टी थकबाकी वसूल करावी, पाणीगळती बंद करावी अशा मागण्या केल्या आहेत.










