इलेक्ट्रॉनिक रिक्षाला परवानगी देताना विश्वासात घ्या : बाबा कांबळे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- इलेक्ट्रॉनिक रिक्षा निर्माण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली असून या रिक्षांना परवान्याची आवश्यकता राहणार नाही असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे.
याबाबत बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील ऑटोरिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन इलेक्ट्रॉनिक रिक्षा बाबत संघटनांना विश्वासात घेण्याची मागणी केली असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.
शिष्टमंडळात दिल्ली रिक्षा टॅक्सी संघटनेचे नेते राजेंद्र सोनी, अचल शिंग, मधुकर थोरात, मारुती कोंडे, मोशवीर लोकरे, सुनील बोर्डे, विजय पाटील, श्रीरंग जाधव, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात व भारतात दोन कोटी पेक्षा अधिक रिक्षा चालक मालक आहेत. इलेक्ट्रॉनिक रिक्षामुळे या रिक्षा व्यावसायांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी या साठी इलेक्ट्रॉनिक रिक्षाची मार्गदर्शक तत्वे ठरवताना रिक्षा चालकांना विश्वासात घेण्यात यावे,
रिक्षा इन्शुरन्समध्ये झालेली दरवाढ रद्द करावी, ओला उबेर या कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणावे, देशभरातील रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, रिक्षा चालक – मालकांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी नितीन गडकरी यांनी रिक्षा चालकांना आजारपणात पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कव्हरेज देण्याची घोषणा लवकरच सरकारच्या वतीने करण्यात येईल, असे आश्वासन या शिष्टमंडळास दिले.