न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे उद्योजक हैराण झाले असून, महापालिकेच्या पाणी धोरणामुळे परिसरात टॅंकर मागवून पाण्याची तहान भागविली जात आहे. याबाबत पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ”विशेषता पेठ क्रमांक ७ व १० या प्राधिकरणाच्या औद्योगिक पेठामधील अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. पेठ क्रमांक ७ व १० या प्राधिकरणाच्या औद्योगिक पेठमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा दिवसातून फक्त १ वेळ सकाळी १ तास केला जातो पेठ क्रमांक ७ व १० हा परिसर उंच सखल असल्यामुळे तसेच पाणीपुरवठा पुरेश्या दाबाने होत नसल्यामुळे सर्व कंपन्याना पुरेश्या दाबाने पाणी मिळत नाही त्यामुळे नाईलाजाने उद्योजकांना टॅंकर मागवून पाण्याची गरज भागवावी लागते.
तसेच महानगरपालिका या पाण्याचा दर ५० रु. प्रती ह्जार लिटर आकारते. पालिकेची दर आकारणी निवासी व व्यापारी अशी आहे. पालिकेकडे उद्योगासाठी वेगळा दर नाही. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात असलेल्या कंपन्या या ऑटोमोबाइल संबंधित असून ह्या कंपन्यांना कामगारांना पिण्यासाठी व वापरासाठी पाणी लागते. या पाण्याचा व्यापारी वापर होत नाही. तरीही पालिका पाणीबिलाची आकारणी व्यापारी दराने करते. याबाबत पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने पालिकेकडे अनेक वेळा पाठ पुरावा केला आहे. परंतु, पालिका पुरेश्या दाबाने पाणी पुरवठा न करता पाणी पट्टी दराची फेररचना करत . मा. आयुक्त साहेबांबरोबर पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या झालेल्या अनेक बैठकामध्ये संघटनेने अपुरा पाणीपुरवठा व जादा पाणीपट्टी दर कमी करण्याबाबत पाठपुरावा केला आहे.
परंतु, पालिका प्रशासन दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून ह्या विषयावर कोणताही निर्णय घेत नाही, त्यामुळे उद्योजकाना पाण्यासाठी टँकरवर अबलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आधीच ५० रु, प्रती १ हजार ली.चे महागडे पाणी पट्टी बिल भरायचे वर पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे टँकरची बिले भरायची अश्या दुहेरी आर्थिक कात्रीत सापडल्यामुळे उद्योजक त्रस्त झाला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातून अनेक उद्योग स्थलांतरीत होण्यामागे हे देखील एक महत्वाचे कारण आहे.
या विषयी बोलताना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, “औद्योगिक परिसरात पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे अनेक उद्योगांना टॅंकरच्या पाण्याने तहान भागवावी लागते. तसेच पाणी पट्टी बिलही जादा दराने भरावे लागते. हा उद्योग क्षेत्रावर अन्याय आहे.
सदर प्रश्न संघटनेने आयुक्तांसोबत झालेल्या अनेक बैठकांमध्ये मांडला असून, उद्योग क्षेत्राला दिवसातून किमान २ वेळा पुरेश्या दाबाने किमान तीन तास तरी पाणीपुरवठा करावा. सध्या वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सध्या किमान एक वेळा तरी किमान तीन तास पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावा. तसेच पाणीपट्टी आकारणीचा दर कमी करून, तो व्यापारीएवजी औद्योगिक दराने एम.आय.डी.सी. प्रमाणे करावा, अशी मागणी बेलसरे यांनी केली. या प्रश्नाबाबत महानगरपालिकेने गांभीर्याने विचार न केल्यास पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बेलसरे यांनी या पत्रात दिला आहे.










