न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२३) :- गणेशोत्सव काळात मनमानी पद्धतीने भाडेवाढ करून खासगी प्रवासी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट केली जाते. या लुटीला प्रतिबंध करण्यासाठी खासगी प्रवासी वाहनांच्या तिकिटांचे दर निश्चित केले आहेत. एसटी बसच्या तिकिटाच्या जास्तीत जास्त दीडपट भाडे खासगी प्रवासी वाहतूक करणारे आकारू शकतात. यापेक्षा जास्त भाडे आकारले तर प्रवासी आरटीओकडे तक्रार करू शकतात.
खासगी प्रवासी वाहन चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली तर त्यांच्यावर आरटीओमार्फत कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी वाहनाचा प्रवासी परवानाही निलंबित केला जाऊ शकतो. शिवाय चालकांचादेखील परवाना रद्द होऊ शकतो. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहनांवर आरटीओचे लक्ष असणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध बससाठी वाहतुकीचे भाडेदर निश्चित केलेले आहेत. त्यानुसार खासगी कंत्राटी परवान्यावरील वाहनाचे त्या बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर सरकारने निश्चित केले आहेत. मात्र, काही खासगी प्रवासी बस सणासुदीच्या व गर्दीच्या काळात प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारतात. त्या पार्श्वभूमीवर सरकारने निश्चित केलेल्या प्रतिकिलोमीटर भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स, बस यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.