- वायसीएममधून उपचारासाठी हलवावे लागले ससून रुग्णालयात..
- पालकमंत्री अजित पवारांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२३) :- तळवडे येथील केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कैंडल) मेणबत्ती कारखान्यात आग लागून स्फोट होऊन सहा जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर, जखमी असलेल्या दहा रुग्णांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील चार महिलांची प्रकृती चिंताजनक आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकाही रुग्णालयात भाजलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी जळीत कक्ष (‘बर्न वॉर्ड’) नाही. भाजलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. मात्र, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जळीत कक्षच नसल्याने त्यांना ससून रुग्णालयांत दाखल करण्याशिवाय पर्याय राहत नाही. दरम्यान, मागील १४ वर्षांपासून जळीत कक्षाचे भिजत घोंगडे आहे.
वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये आठ मोठी रुग्णालये, २७ दवाखाने, २० आरोग्य केंद्र आहेत. ७५० खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), ४०० खाटांचे थेरगाव, शंभर खाटांचे नवीन भोसरी, १३० खाटांचे नवीन आकुर्डी आणि १२० खाटांचे नवीन जिजामाता यासह एक हजार ५८९ खाटांची व्यवस्था महापालिकेच्या रूग्णालयात आहे. परंतु, त्यातील कोणत्याही रुग्णालयात जळीत कक्ष नाही. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागते. वायसीएममध्ये जळीत कक्ष नसल्याने केवळ प्रथमोपचार केले जातात. योग्य उपचारासाठी रुग्ण ससूनमध्ये दाखल होईपर्यंत उशीर झालेला असतो. परिणामी, रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत.
शहरात भोसरी, तळवडे आणि शहरालगत चाकण, तळेगाव दाभाडेमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर आहे. मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत. दुर्घटना घडल्यानंतर जखमीला उपचारांसाठी वायसीएम दाखल केले जाते. मात्र, येथे प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात हलवले जाते. वायसीएम रुग्णालयात मागच्यावर्षी २१३, चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ११६ जळीत रुग्ण उपचारांसाठी आले होते. किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. तर, गंभीर जखमींना ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.
जळीत रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र इमारतीची आवश्यकता असल्याची बाब लक्षात घेऊन याबाबत तत्कालीन मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांनी २००९ मध्ये प्रस्ताव मांडला होता. त्यासाठी वीस कोटींचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला होता. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती. परंतु, त्या प्रस्तावाचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.
तळवडे येथील आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या घटनेबाबत ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार सुरु असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी प्रार्थना करतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्ण उपाययोजना केल्या जातील, असे ते म्हणाले.












