- लवकरच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी घेणार – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२४) :- मावळ तालुक्यातील श्री समर्थ बैठकीचा परिसर, पुरातन मंदिरे व भोवतालचा परिसर पुरेशा प्रकाशाने उजळून निघणार आहे. यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत नुकतीच एक बैठक पार पडली असून नजीकच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेवून यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी विनंती करणार आहेत.
मावळ तालुक्यातील श्री समर्थ रामदासांच्या सदस्य बैठकीचे ठिकाण आणि तालुक्यातील मंदिरांच्या परिसरात पुरेसा प्रकाश असावा, जेणेकरून येथे येणारे सदस्य व भाविकांना अंधाराचा त्रास होणार नाही, असे मत या बैठकीत मांडण्यात आले. तसेच परिसरात पुरेसा प्रकाश राहिल्याने हा भाग स्वच्छ होईल. तसेच अन्य सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा नागरिकांना व भाविकांना फायदा होणार आहे. या सर्व बाबींची बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, आजही तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक श्रद्धास्थानांच्या ठिकाणी सुविधा विकसित करण्यासाठी वाव आहे. श्री समर्थ बैठकीच्या ठिकाणी व मंदिर परिसरात योग्य त्या प्रकाश व्यवस्थेची गरज आहे. काही भजनी मंडळी मंदिरात भजन करून रात्री उशिरा घरी जातात यामुळे अशा ठिकाणी प्रकाश व्यवस्था असावी. यासाठी आपण लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन विकास कामासंदर्भात विशेष निधी उपलब्ध होण्यासाठी विनंती करूयात. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावूयात.
यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन घोटकुले, सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुर्हे, मावळ तालुका कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, बाबुलाल गराडे, सरपंच राकेश पारे, माजी सरपंच नवनाथ मुर्हे, अविनाश गराडे, शैलेश मुऱ्हे, पप्पू चांदेकर आदी उपस्थित होते.