- गिर्यारोहक तानाजी केकरे याची नव्या विक्रमाला गवसणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२४) :- महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखराची चढाई अवघ्या ३८ मिनिटे १४ सेकंदामध्ये सर करून तानाजीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण हे शिखर चढाईसाठी गिर्यारोहकांना २ ते ३ तास लागतात. तानाजी केकरे महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचा प्रमुख गिर्यारोहक आहे. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी हा उपक्रम राबवण्यात आला.
अकोले तालुक्यात पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत उभ्या ठाकलेल्या या शिखराची चढाई म्हणजे भल्या भल्या गिर्यारोहकांची दमछाक होते. त्याच्या चढाईची आखणी गिर्यारोहण क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र रेंजर्स संस्थेने केली. तानाजी व टीमने ११ जानेवारीला बारी या गावी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच चढाईची तयारी केली. रोजचा सराव व प्रचंड मेहनतीच्या जोरावर तानाजीने हे शिखर विक्रमी वेळेत सर केले. या मोहिमेत महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचे प्रदीप गायकवाड, जयेश हरड, अखिल सुळके, रामदास ठवळे, समीर कोंदे, सुनील येवले, मिलन गायकवाड, गिरीश पाटणकर आणि गौतमी येवले आदी सहभागी झाले होते.
हा विक्रम मोडला..
यापूर्वीचा विक्रम बारी येथील गिर्यारोहक साजन भांगरे यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये कळसुबाई शिखर ४२ मिनिटामध्ये सर केल्याची नोंद आहे.
यापूर्वीही कठीण सुळक्यांवर चढाई..
तानाजी केकरे हे गिर्यारोहण क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व असून त्यांनी बेसिक तसेच ऍडव्हान्स रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे तसेच सुवर्णपदक संपादन केले आहेत. ते आंबेवाडी गावाचे रहिवासी असून एक अनुभवी ट्रेक गाईड म्हणूनदेखील कार्यरत आहेत. याआधी लिंगाना हा अवघड श्रेणीतील सुळका ११ मिनिटे २२ सेकंदात तसेच अलंग मदन कुलंग हे दुर्गत्रिकुट ३ तास १२ मिनिटात सर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तानाजी यांनी याआधी वजीर, वानरलिंगी, कळकराई, तैलबैला यासारख्या अत्यंत कठीण अशा सुळक्यांवर यशस्वीरीत्या चढाई केली आहे.