न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १५ जानेवारी २०२४) :- शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरुन ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १० जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेंच्या बाजुने निकाल दिला. यामध्ये भरत गोगावले यांची प्रतोद म्हणुन नियुक्ती योग्यच असून त्यांनी काढलेला व्हीपच योग्य आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. विधीमंडळ पक्ष ज्याचा असतो त्याचाच मुळ पक्ष असतो. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही. त्यामुळे आता शिंदेचा पक्षच मुळ शिवसेना राजकीय पक्ष असणार आहे, असा निकाल राहूल नार्वेकर यांनी दिला. दरम्यान, याप्रकरणी आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
एकनाथ शिंदेंसोबत असलेला गट म्हणजेच खरी शिवसेना असे या निकालामधून स्पष्ट झाले. मात्र या निकालानंतर ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांविरोधात संताप व्यक्त केला होता. राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाविरोधात निकाल दिला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. त्यामुळेच आता ठाकरे गटाने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असल्याचे ठाकरे गटाने या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.