न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२४) :- आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूरच्या लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हेच उमेदवार राहणार आहेत. शिरूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार आहे. शरद पवार यांना प्रचंड सहानुभूती आहे. त्याचा फायदा घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी भोसरीत झाली, त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.
यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रकाश म्हस्के, बसवराज पाटील, शेखर माने, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहराध्यक्ष तुषार कामठे, महिलाध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवकाध्यक्ष इम्रान शेख, देवेंद्र तायडे, काशीनाथ नखाते आदी उपस्थित होते.
पूर्वी पक्ष फोडायची पद्धत होती. आता पक्ष चोरायची पद्धत सुरु आहे. त्यामुळे स्वतःचे कर्तृत्व नसले की, माणूस दुसऱ्याचे चोरतो. मात्र, ज्याने कर्तृत्वाने पक्ष निर्माण केला आहे, त्याचा पक्ष चोरला तरीही तो परत निर्माण करण्याची धमक ठेवतो, असे म्हणत युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
जयंत पाटील म्हणाले, लोक पक्ष सोडून गेले तरी चिंता करू नका. मतदार त्याच ठिकाणी असतो. त्यामुळे निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचणारे सैन्य निर्माण करा, ते सैन्य नसेल, तर मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड होईल. भोसरी विधानसभा मतदारसंघात बुथ बांधणी लवकर करा. वेळ हातून निघून जात आहे.