- शहराला पाणीपुरवठा करणारं पंपिंग स्टेशन कोसळण्याचा धोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- किवळे व रावेत पंपिंग स्टेशन जवळील पवनेच्या नदीपात्रात होत असलेल्या भरावामुळे ३० पेक्षा जास्त पाणकोंबड्यांचा अधिवास नष्ट झाला असून नदीपात्रातील बेसुमार भरावाच्या अतिक्रमणामुळे अनेक पक्ष्यांनी स्थलांतर केलं आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनलासुद्धा भरावामुळे पावसाळ्यात धोका निर्माण होईल, असा इशारा प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष विजय पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रावेत पंपिंग स्टेशन जवळील पवना नदी पात्रात भराव टाकून होत असलेले अनधिकृत बांधकाम. ब्लू लाईन म्हणजेच पूर नियंत्रण रेषेच्या नियमांना धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात पवना नदीच्या पात्रात सध्या मुरूम व राडारोडा टाकून जमीन निर्मितीचे काम सुरू आहे. पालिकेच्या रावेत पंपिंग स्टेशन ला लागूनच हा प्रकार सुरू आहे. नदी पात्रात भराव टाकत असल्यामुळे भविष्यात पंपिंग स्टेशनलाच धोका निर्माण होण्याची शक्यता असून शहराला पाणी पुरवठा करणारे पम्पिंग स्टेशन पावसाळ्यात बंद पडण्याची शक्यता आहे. गेल्या चार महिन्यात मोठ्या प्रमाणात नदी पात्र बुजवल्यामुळे २०० मीटर पेक्षा जास्त नदीच्या पात्रालगत जागेवर अतिक्रमण झालेले स्पष्ट दिसत आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पर्यावरण विभागाचे सदस्य विजय मुनोत, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, सतिश देशमुख, अर्चना घाळी, गौरी सरोदे,नितीन मांडवे, सुकेश येरूनकर,रामेश्वर गोहिल,अजय घाडी, राजेश बाबर, सतीश मांडवे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता पवना नदी ही रावेत व किवळे परिसरातील अतिक्रमणाचा विळख्यात अडकत चालली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरातील जागेंच्या किमती आकाशाला भिडल्या असल्याने अनेकांनी आपला मोर्चा नदीपात्राजवळील जमिनीकडे वळवला आहे. मोठ्या प्रमाणात नदी पात्रात भराव टाकून जमीन निर्मिती करण्याचा उद्योग सुरू असून पालिका सोईस्करपणे दुर्लक्ष का करीत आहे? असे पर्यावरण प्रेमींना वाटते.अश्या नदीतील अतिक्रमणाचा फटका तेथील पर्यावरणाला बसल्याने अनेक पक्षी व जलचरांचा अधिवास त्यामुळे नष्ट झाला आहे.
रावेत परिसरात नदीवर बंधारा असल्याने नदीच्या दोनही पात्राजवळील भागात ( किवळे -रावेत ) दलदल निर्माण झाल्यामुळे पाणकोंबड्याना पोषक वातावरण निर्मित झाले आहे.त्या मुळे ह्या भागात पाणकोंबड्यांचा मोठा अधिवास अनेक वर्षांपासून पक्षीप्रेमींना आढळून आलेला आहे. त्यातच दिवसेंदिवस नदीच्या दोनही बाजूला होत असलेले अतिक्रमण नदी पात्राची रूंदी कमी करत आहे.पालिका व पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पूर रेषेचे तीन तेरा वाजले आहेत.२०१० नंतर पाटबंधारे विभागाने सर्वेक्षण केलेच नसल्याने पवनेचे नदी पात्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. ब्लू लाईन व रेड लाईन आता फक्त कागदावरच नकाशाच्या स्वरूपात राहिलेली असून पवना नदीचे १५ किलोमीटर पेक्षा जास्त शहरी भागातील पात्र अतिक्रमित झालेले आहे. दलदलीच्या भागातील झुडपांमध्ये पाणकोंबड्यांचा अधिवास भरावाच्या अतिक्रमणामुळे पूर्णपणे नष्ट झाला आहे. पंपिंग स्टेशन जवळ ३० पेक्षा जास्त पाणकोंबडयांचा अधिवास नोंदला गेला होता पण भरावामुळे आता त्याचे अस्तित्व राहिलेले नाही.अनेक पक्ष्यांनीही तेथून स्थलांतर केले आहे. वेळीच नदी पात्रातील अतिक्रमण रोकले नाही तर येणाऱ्या पावसाळ्यात पंपिंग स्टेशनला सुद्धा धोका पोहचण्याची शक्यता आहे. मा. विजय पाटील, राज्य अध्यक्ष – प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती…