न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२४) :- भारतीय स्वातंत्र्यलढ्यात चिंचवड येथील चापेकर बंधुंचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे.या तीनही बांधवांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि देशातील क्रांतीची धगधगती ज्वाला अधिक प्रज्वलित केली.एकाच चापेकर घरातील ऐन पंचविशीतील तीन बंधू देशासाठी हौतात्म्य पत्करण्याची देशातील एकमेव घटना असून त्यांच्या प्रखर देशभक्तीचा वारसा भावी पिढीतील तरुणांनी जोपासावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समितीचे सदस्य सुहास पोफळे, लोकशाहीर आसाराम कसबे, समितीचे उपाध्यक्ष डॉ.अशोक नगरकर, व्यवस्थाप्रमुख अतुल आडे, श्रीकांत जोशी, समर्थ डोंगरे तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री डाॅ.प्रभुणे म्हणाले, दामोदर चापेकर यांचे वडील कीर्तनकार होते तसेच ते वैद्यकी देखील करायचे त्यानिमित्ताने त्यांचा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश,आदी ठिकाणी प्रवास असायचा. वडीलांसमवेत प्रवास करत असताना दामोदर व त्यांच्या बंधूंनी इंग्रजांकडून होणारे अत्याचार प्रत्यक्ष पाहिले होते , इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराची दामोदर यांना मनस्वी चीड होती.पुण्यामध्ये १८९७ काळात प्लेगची साथ आली होती. प्लेगपीडित रूग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी रॅंड या इंग्रज अधिका-यांच्या नियंत्रणाखाली पुण्यातील घराघरात शोध करताना नागरिकांवर अत्याचार केले. इंग्रजांविरूद्धात सर्वत्र असंतोष पसरू लागला होता त्यातूनच दामोदर यांनी रॅंडचा वध करण्याची योजना आखली. त्यांचे लहान भाऊ बाळकृष्ण व वासुदेव दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असत. त्यांनी स्वत:चे सैन्य उभे करण्याचे ठरविले. पुण्यात पर्वती आणि चिंचवडला धनेश्वरच्या पाठीमागे त्यांनी लाठी-काठी,बंदूक चालविण्याचे वर्ग घेतले . यासाठी त्यांनी अनेक तरूणांना एकत्र आणले आणि लढण्याचे प्रशिक्षण देऊन इंग्रजांविरोधात बंडही पुकारले.
दरम्यान, २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंड येथे रॅड येणार असल्याची माहिती मिळताच दामोदर चापेकर यांनी बांधवाच्या सहकार्यांनी रॅंडचा वध केला असे सांगून क्रांतिवीर चापेकर बंधूच्या सन्मानार्थ चिंचवडगांव येथे भव्य शिल्प उभारले असल्याची माहिती पद्मश्री डॉ. प्रभुणे यांनी दिली.