- जन्म आणि मृत्यू दाखल्यांच्या वाटपासाठीही अतिरिक्त खिडकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- वायसीएम (यशवंतराव चव्हाण स्मृती) रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर असणाऱ्या रुग्णालयाचे प्रवेशद्वार साडे नऊनंतरही सुरूच राहणार आहे. रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी गैरसोय तसेच सीएमओ विभागाकडून जाताना होणारी गर्दी देखील टळणार आहे. सीएमओ विभागाच्या बाजूने केवळ अतिगंभीर रुग्णांसाठीच प्रवेश दिला जाणार आहे.
वायसीएम रुग्णालयात केसपेपर काढताना मुख्य प्रवेशद्वारातून जावे लागते. सकाळी सहा ते साडे नऊ वाजेपर्यंत सुरू होते. रुग्णालयातील कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर हे प्रवेशद्वार बंद केले जात होते. त्यानंतर सीएमओच्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत जावे लागत होते. त्यामुळे अति गंभीर रुग्णांची आणि इतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची गर्दी होत असे. त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत होता. त्यावर उपाय म्हणून मुख्य प्रवेशद्वार साडे नऊ नंतर देखील सुरूच ठेवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.
अतिदक्षता विभागाच्या प्रवेशद्वारातून अतिगंभीर रुग्णांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या प्रवेशद्वारातून इतर रुग्णांना व नातेवाइकांना तसेच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना देखील न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या या निर्णयामुळे अतिगंभीर रुग्णांना लवकर प्रवेश मिळून तातडीने उपचार होण्यास मदत होणार आहे.
या बरोबरच जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांचे वाटप करण्यासाठी वायसीएममध्ये पाच खिडक्यांची सुविधा देण्यात आली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत दाखल्यांचे वाटप करण्यात येत होते. त्या वेळेमध्ये देखील वाढ करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. परिणामी नागरिकांना दाखले देखील वेळेत मिळणार आहेत.