- भर उन्हाळ्यात नागरिकांसह उद्योजक हैराण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२४) :- चिखली गावठाण परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. ऐन उन्हाळ्यात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्याचबरोबर वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्याने चिखली परिसरातील शेकडो लघु उद्योगाचे कामकाज ठप्प होत असून त्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
चिखली आणि मोई या दोन्ही गावांना एकाच वीज वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जातो. मात्र, मोई परिसरातील खाणीत शेकडो क्रशर आहेत. त्याने, चिखली परिसरातील वीज पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात ताण येऊन वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याची ग्रामस्थांकडून तक्रार करण्यात येत आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत आहे.
रात्री-अपरात्री कधीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने आणि सध्या उष्णता वाढल्याने नागरिक उकाड्याने अक्षरशः हैराण होत आहेत. त्याचबरोबर चिखली परिसरात शेकडो लघुउद्योग आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योगांचे कामकाज बंद पडत आहे. या परिसरातील लघु उद्योगांमध्ये हजारो कामगार काम करत असून त्यांना बसून पगार देण्याची वेळ लघुउद्योजकांवर येत असल्याने लघुउद्योजक देखील आर्थिक संकटात सापडले आहेत.
चिखली गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याबद्दल ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे, चिखली गावासाठी वेगळी केबल टाकण्याची काम हाती घेण्यात आले आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येईल.
– अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग, महावितरण…