- नागरिकांचा सहभाग महत्वाचा; अभिप्रायासाठी गाठा पालिकेचे संकेतस्थळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२४) :- जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच अति उष्णता वाढीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी महापालिकेच्या वतीने हिट अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असून याबाबत नागरिकांनी आपले अभिप्राय २० जुलै २०२४ पर्यंत महापालिकेला कळवावेत, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
जगातील अनेक देशांसह भारतानेही वाढते वातावरणातील तापमान हा विषय गांभिर्याने घेतला आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दरवर्षी जागतिक तापमानातही वाढ होताना दिसत आहे. या सर्व बाबींचा दैनंदिन कामकाज करत असताना अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. तापमान बदल व वाढत्या उष्णतेबाबत पुरेशी काळजी आणि उपाययोजना केल्या नाही तर उद्भवणार्या समस्यांचा प्रत्येक घटकाला सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यामुळे उद्भवणार्या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि उष्माघात या आजारांचा समावेश असतो. याशिवाय त्वचेसंदर्भात समस्या देखील उद्भवू शकतात. वातावरणातील कमाल तापमानात ४ डिग्री ते ५ डिग्रीपेक्षा अधिक वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते.
शहरातील विविध भागांमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असले तरी रात्रीच्या वेळी तापमान कमी होण्यास अधिक वेळ लागत असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी प्रशासकीय आणि शहरी नियोजन करणे गरजेचे असून सार्वजनिक पायाभूत सुविधा, जनजागृती, क्षमता निर्माण आणि तापमानाचा सर्वात जास्त परिणाम होणारे समुदाय ओळखून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने तयार केलेला हिट अॅक्शन प्लॅन हा उष्णतेच्या संबधित आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर उष्णता वाढीचा दुष्परिणाम होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या हिट अॅक्शन प्लॅनच्या आराखड्यात पूर्व चेतावणी प्रणालीची अंमलबजावणी, शीतकरण केंद्राची स्थापना आणि जागरूकता मोहिमांची अंमलबजावणी या उपायांचा समावेश असणार आहे. तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नागरी सहभाग महत्वाचा असून यासाठी महापालिका तयार करत असलेला पिंपरी चिंचवड शहराचा हीट ऍक्शन प्लॅन उपयुक्त ठरणार आहे, असेही आयुक्त यांनी सांगितले.
अति उष्णतेच्या घटना सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण आव्हाने उप्तन्न करतात. ज्याचा सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी परिणाम होतो. हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढत असताना, उष्णतेच्या लहरींची वारंवारता, तीव्रता आणि कालावधी वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे अति उष्णतेशी संबंधित धोके वाढतात. हे धोके कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेही आयुक्त यांनी
सांगितले.
हीट ॲक्शन प्लॅन हा मूलभूत उद्दिष्टांच्या त्रिसूत्रीद्वारे चालविला जातो. उष्णतेशी संबंधित आजार आणि मृत्यूच्या घटना कमी करून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते. सामुदायिक लवचिकता वाढवणे, लोकसंख्येला उष्णतेच्या लहरींच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी आणि त्यातून सावरण्यासाठी सक्षम करणे आणि अत्यावश्यक सेवा आणि पर्यावरणीय कार्यांचे सातत्य सुनिश्चित करून, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणावरील अति उष्णतेच्या घटनांचे प्रतिकूल परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते. हिट अॅक्शन प्लॅन योजनेचे पुनरावलोकन करण्यासाठी तसेच योजनेसंदर्भात येणाऱ्या सूचना, प्रश्नांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्यात आली असून नागरिकांनी नोंदविलेला हा अभिप्राय तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले आहे.
अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/heat-action- plan.php या वेबसाईटला भेट द्या
https://www.pcmcindia.gov.in/marathi/pdf/Template-for-feedback.pdf या ठिकाणी नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदवावा.
कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास – disastermgmt@pcmcindia.gov.in मेल आय डी वर मेल करू शकता.
अभिप्राय नोंदविण्याची अंतिम दिनांक – २० जुलै २०२४












