न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२४) :- शहरात निर्माण होणा-या ओल्या कच-यावर प्रक्रिया करून सीएनजी गॅस निर्मिती करणारा प्रकल्प महापालिकेने मोशी येथे उभारला आहे. त्यासाठी हॉटेल्स, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट धारकांनी १०० टक्के ओला कचरा विलगीकरण करून महापालिकेच्या ओला कचरा संकलित करणाऱ्या विशेष वाहनातच टाकावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील आयुक्त यांच्या दालनात हॉटेल व्यावसायिक संघटनांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांच्यासह विविध हॉटेल संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरात निर्माण होणा-या विविध कच-याचे व्यवस्थापन करून योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोशी येथे कच-यापासून उर्जा निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी हॉटेल वेस्ट मधील ओल्या कच-यापासून सीएनजी वायू निर्मितीचा प्रकल्प साकारण्यात आला आहे. यासाठी शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, खानावळ, कॅन्टीन, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने अशा ठिकाणी निर्माण होणारा ओला कचरा महापालिकेच्या विशेष वाहनाद्वारे संकलित करण्यात येत आहे. संकलित करण्यात आलेल्या ओल्या कच-यावर मोशी येथील कचरा डेपो येथे प्रक्रिया करून सीएनजी वायू तयार करण्यात येत आहे. त्यासाठी १०० टक्के ओला कचरा विलगीकरण करणे आवश्यक आहे,जेणेकरून शुद्ध सीएनजी तयार करण्यास मदत होईल. त्यामुळे शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, खानावळ, कॅन्टीन, खाद्यपदार्थ विक्रीधारकांनी आपल्या व्यवसायात निर्माण होणारा ओला कचरा १०० टक्के विलगीकरण करून विशेष वाहनातच टाकावे, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे.
ओल्या कच-यापासून सीएनजी निर्माण करण्याचे काम अन्वी डीएम ग्रीन एनर्जी या खाजगी संस्थेद्वारे हा प्रकल्प संचालित करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात ओला कचरा संकलित करणारे विशेष वाहन पाठविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने हॉटेल वेस्ट वाढवून दररोज ५० टन हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करून २ हजार किलो सीएनजी तयार करण्याचे उद्दिष्ट्य आहे. शिल्लक राहिलेल्या लगद्यापासून लिक्विड फर्टिलायझर तयार केले जाईल. शहराचे झपाट्याने होणारे विस्तारीकरण, वाढणारी लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा याचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच दुर्गंधी, रोगराईपासून शहरवासियांची कायमची सुटका करण्यासाठी या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यावर अधिक भर देणार असल्याचेही ते म्हणाले.














