न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०१ जून २०२५) :- कडाचीवाडी (ता. खेड) येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले.
ओमकार बाबासाहेब हंगे (वय १३, सध्या रा. मार्तडनगर, मेदनकरवाडी, मूळ रा. हंगेवाडी, ता. केज, जि. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. धनवडी, ता. वरुड, जि. अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अंबुलगा, ता. मुखेड, जि. नांदेड), नैतिक गोपाल मोरे (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. बुलढाणा झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.
उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणासाठी या मुलांचे पालक इतर जिल्ह्यांतून आले. भाड्याने खोल्या घेऊन ते राहात आहेत. मेदनकरवाडीचे माजी सरपंच महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर आदींनी नातेवाइकांचे सांत्वन केले. रात्री उशिरा मुलांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मुलांची सुरक्षितता हा विषय महत्त्वाचा आहे.
मुलांना मित्रांसोबत बाहेर जाताना मग फिरायला असो किंवा पोहायला वा इतर बाबीसाठी असो, पालकांनी चौकशी करणे अत्यावश्यक आहे. तरच अशा घटनांना वेळीच टाळता येईल.
– संजय बोरकर, प्राचार्य, भामचंद्र विद्यालय, भांबोली…