न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- महाराष्ट्रातील मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, रिक्षा चालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, हकीम कमिटीच्या शिफारशी प्रमाणे रिक्षा भाडेवाढ देण्यात यावी, ऍपद्वारे बेकायदेशीर प्रवाशी व्यवसाय करणाऱ्या खाजगी कंपन्यावर बंदी आणावी, रिक्षाचे सातत्याने वाढत असलेले इन्शुरन्स बाबत समिती नेमून रिक्षाचे इन्शुरन्स कमी करण्यासंदर्भात प्रयत्न करावेत, ग्रामीण भागात वडाप पद्धतीने होणारे बेकायदेशीर वाहतुकीवर बंधने आणावेत. शहरी भागात मॅजिक जीप, सहा सीटर इतर विविध वाहनांमधून होणारी बेकायदेशीर वाहतूक बंद करावी.
यासह इतर विविध रिक्षाचालकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून, या सर्व प्रश्नांवर चर्चा करून याबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी ९ जून २०१९ रोजी सकाळी दहा वाजता मुंबई येथील गोरेगाव येथे महाराष्ट्रातील रिक्षा संघटनांची आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.
कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर, संपर्कप्रमुख नरेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष गफार नदाफ, मारुती कोंडे, प्रल्हाद सोनवणे, शिवाजी गोरे, सहसचिव मच्छिंद्र कांबळे फिरोज मुल्ला, सुरेश गलांडे, महादेव विभुते, एलियाज लोधी, राहुल कांबळे, ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून सरकार दरबारी रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही. यामुळे रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी लवकरच महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका या मेळाव्यामध्ये ठरण्याची शक्यता आहे


















