- राष्ट्रवादीच्या संदीप काटेंची महापालिका आयुक्तांना सूचना…
…न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात करोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये समज-गैरसमज वाढत चालले आहेत. या विषाणुंपासून स्वता:ची काळजी घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने आपली अन्य कामे तात्पुरती स्थगित ठेवून करोनासह संसर्गजन्य विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील नायडू रुग्णालयाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी करोनाचा सामना करण्यासाठी प्राथमिक स्तरावर उपाययोजना केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मात्र, या विषाणुबाबत समाजात भिती पसरवली जात आहे. योग्य काळजी घेतल्यास करोना विषाणुंपासून स्वतःचा बचाव करणे शक्य आहे. याची माहिती नागरिकांना देण्याची गरज आहे. महापालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी. नागरिकांच्या घरी जाऊन करोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करावे. पालिकेतर्फे शाळा, महाविद्यालये, झोपडपट्टी आदी भागात मास्क, सॅनिटायझर वाटप करावेत. जेणेकरून सुरक्षेसाठी वापरली जाणारी साधणे त्यांना कळतील, असेही संदीप काटे यांनी प्रसिध्दीपत्रकातून पालिका प्रशासनाला सूचित केले आहे.
करोना विषाणुबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात १० बेडचा कक्ष सुरू केला आहे. भोसरी रुग्णालयात ४० बेडचा स्वतंत्र विभाग सुरू केला आहे, अशी माहिती देण्यात आली. मात्र, पालिकेने करोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय उभा करावे. सध्या आकुर्डी, थेरगाव, पिंपरी, मासुळकर कॉलनी, भोसरी येथील रुग्णालयाची कामे पूर्णत्वास आहेत. यातील जास्ती जास्त खाटाचे एक रुग्णालय सोयीसुविधांनी सुसज्ज करून पुण्यातील नायडू रुग्णालयाच्या धर्तीवर सुरू करावे, अशी मागणी संदीप काटे यांनी केली आहे.
शहरात महापालिकेची अनेक रुग्णालये आहेत. तर, काही नवीन रुग्णालयांचे बांधकाम सध्या सुरू आहे. करोनाची आपत्ती ओळखून नवीनपैकी एक रुग्णालय तातडीने उभा करावे. पुण्यातील नायडू रुग्णालय ज्या पध्दतीने सुरू करण्यात आले. तसे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व कामे बाजुला ठेवून करोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे, असेही संदीप काटे यांनी या पत्रकात म्हटले आहे.













