न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. सप्टेंबर. २०२०) :- कंत्राटी वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जो पर्यंत तोडगा निघत नाही, तो पर्यंत सध्याची भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी, कंत्राटी कामगारांनी जितक्या वर्षे काम केले तितक्या वर्षांची सवलत भरती प्रक्रियेत मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगार संघटनांच्या वतीने येत्या सोमवारपासून (दि. ७) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इच्छा मरणाची परवानगी मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
काही निवडक पदाधिकारी विधान भवनावर धडकणार असल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी दिली. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, तांत्रिक अॅपेंटीस, कंत्राटी कामगार संघटना आणि वीज कंत्राटी कामगार बाह्यस्त्रोत संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेच्या औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत इच्छामरण आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
कृती समितीच्या मागण्या
महावितरणमधील भरतीमुळे एकही कंत्राटी कामगार घरी जाणार नाही याची, ऊजामंत्र्यानी लेखी हमी द्यावी, वीज मंडळातील शिकाऊ उमेदवारांप्रमाणे वयाची सवलत व १० टक्के विशेष आरक्षणात वाढ करावी, कंत्राटी कामगारांनी जितकी वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम केले तितकी वर्षे त्यांना भरती दरम्यान वयात सवलत मिळावी, किमान वेतनावरील त्यांचा १० ते १५ वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन भरतीमध्ये किमान ५० टक्के आरक्षण द्यावे.