- त्यामुळे कोरोनाचा डोस प्रत्येकालाच गरजेचा नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- मागील दहा महिन्यांपासून देशात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक लोकांमध्ये पुर्वीचीच प्रतिकारशक्ती आहे. लहान मुलांना धोका कमी आहे. त्यामुळे देशातील प्रत्येकालाच लस घ्यावी लागणार नाही. मात्र, भविष्यात रुग्ण किती आढळतात आणि सीरो सर्व्हेमध्ये किती लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर येते, यानुसार लसीकरणाचे नियोजन करावे लागेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
फायझर कंपनीच्या माजी उपाध्यक्षांनी कोरोनाची साथ ओसरत असल्याचे सांगून आता लशींची गरज नसल्याचा दावा केला आहे. तसेच ‘ आयसीएमआर’ नेही देशातील प्रत्येकाला लस लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लसीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
याविषयी जनआरोग्य अभियानचे डॉ. अनंत फडके म्हणाले, लस कधी येणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तोपर्यंत अनेक लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असेल. काही अभ्यास व तज्ज्ञांच्या मतानुसार ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल.