- वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे आणि खोदकामामुळे स्मार्ट सिटीतील नागरिक बेहाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- देहू-तळवडे मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच वाहनचालकही त्रस्त झाले आहेत.
तीर्थक्षेत्र देहू-आळंदी मार्गावर, देहू- तळवडे दरम्यान असलेल्या रस्त्यावर एका ठिकाणी कमान बांधण्याचे, तसेच पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. परिणामी, तासन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पायी प्रवास करणेदेखील कठीण झाले आहे.
भामा-आसखेड धरणातून पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या भूमिगत मुख्य जलवाहिन्या टाकण्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू होते. त्यामुळे आळंदीकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला आहे. तेथे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाऊसही मोठ्या प्रमाणात पडत आहे. चाकण, भोसरी, तळवडे परिसर आणि एमआयडीसीमध्ये छोटे- मोठे कारखाने असल्याने कामगारांच्या वाहनांचीही लक्षणीय अशी वर्दळ या मार्गावर असते.
पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे अत्यावश्यक कामे वगळता, इतर कामे पावसाळ्यानंतर करण्यात यावीत, वाहतुकीस रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी त्रस्त झालेले वाहनचालक, स्थानिक ग्रामस्थ आणि कामगार करू लागले आहेत. नागरिक याबाबत अनेक तक्रारी करीत असतानाही महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे वाहनचालक, ग्रामस्थ महापालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त करत आहेत. एकेरी वाहतुकीमुळे वाहनांच्या एक-दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत, त्यामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.