न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १८ डिसेंबर २०२३) :- गडकिल्ल्यांचा अभ्यास करायचा झाला तर आपल्याला महाराष्ट्राशिवाय दुसरे ठिकाण सापडणार नाही. एवढा वैभवसंपन्न आहे महाराष्ट्र! म्हणूनच छत्रपतींनी आपल्या स्वराज्य निर्मितीतही गडकिल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून दिले आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कोणत्याही किल्यावर आपण गेलो तर एकच घोषणा दिली जाते आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की असे म्हटले की जय हा प्रतिशब्द आपसूकच येतो. परंतु, छत्रपती शिवरायांच्या या सर्वच गडकिल्ल्यांकडे आजपर्यंत सर्वच सरकारांनी अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे, अशी खंत गड किल्ल्यांचे अभ्यासक, दुर्गप्रेमी मा. निलेश गावडे यांनी व्यक्त केली.
श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल आयोजित सृजनदीप व्याख्यानमालेत पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निलेश गावडे सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती चित्रफितीच्या माध्यमातून पालकांसमोर सादर केली. ही माहिती सांगत असताना गावडे सरांनी सर्वात आधी महाराष्ट्राला लाभलेल्या आणि सर्वदूर पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग कशी जन्माला आली हे सांगितले. ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्री तयार झाला आहे. ही सह्याद्रीची पर्वतरांग नाशिकजवळील तापी नदीच्या उगमापासून ते कोकण प्रांतापासून पुढे कर्नाटक, केरळपासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहे. महाराष्ट्रात या पर्वतरांगेला सह्याद्री हे नाव आहे तर कर्नाटक मध्ये ही पर्वतरांग निलगिरी हिल्स या नावाने ओळखली जाते.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर अनेक किल्ले, डोंगर, दऱ्या आहेत. घनदाट जंगलांची व्याप्ती फार मोठी आहे. एकवेळ डोक्यातील ‘ऊ’ सापडेल पण सह्याद्रीच्या जंगलात सोडलेला हत्ती सापडणे कठीण! गडकिल्ल्यांची माहिती सांगत असताना गावडे सरांनी किल्ल्यांचे प्रकार स्पष्ट करत एकेका किल्ल्यांचे वैशिष्ट्य, वेगळेपण, बलस्थाने स्पष्ट केली. यामध्ये गिरीदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट, जलदुर्ग, किनारीदुर्ग आदी प्रकारांतील किल्ले चित्रफितीच्या माध्यमातून दाखविले. जंजिरा, सिंधुदुर्ग, नळदुर्ग, खांदेरी अशा किल्ल्यांचे वेगळेपण सांगत तोफांबाबतही माहिती सांगितली. कोणत्या व किती धातूंपासून तोफा बनविल्या जातात, त्या किती वेळा कोणाच्या काळात वापरल्या गेल्या याचे अभ्यासपूर्ण विवेचन गावडे सरांनी केले.
सनदी लेखापाल मा. किशोर जाधव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पिंपरी चिंचवड शहराचे माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिरगाव येथील प्र.दे.विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश फरताडे, मोडी लिपीचे तज्ज्ञ, इतिहास संशोधक ब. हिं. चिंचवडे, अजिंक्य सावंत, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक सुबलक्ष्मी पाठक आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीचे विद्यार्थी तसेच पालक रविवारची सुट्टी असूनही बहुसंख्येने या व्याख्यानमालेसाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी केले तर व्याख्याते मानिलेश गावडे यांचा परिचय सहशिक्षिका भारती थोरात यांनी करून दिला. सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहशिक्षिका निशा हिंगे यांनी आभारप्रदर्शन केले.