- नगरसेवक अमित गावडे यांचं आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२४) :- धुलीवंदनला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक अमित गावडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात माजी नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, मागीलवर्षी प्रमाणापेक्षा पाऊस कमी पडल्याने राज्यावर पाण्याचे भीषण संकट आहे. पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरातही पाण्याची हीच परिस्थिती आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मागील सव्वा चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.
शहरवासीय एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. मार्च महिना सुरु होताच पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना पुरेशा दाबाने, मुबलक पाणी पुरवठा होत नाही. पुढील दोन महिने उन्हाळा आणखी तीव्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच पाण्याचा जपून वापर करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
25 मार्च रोजी धुलिवंदन आहे. धुलिवंदनला नागरिक मोठ्या प्रमाणात रंग खेळतात पाण्याचा भरपूर वापर करतात. यंदा पाण्याचे संकट असल्याने धुलीवंदनला पाण्याचा वापर टाळावा, बोअरवेअलच्या पाण्याचाही अपव्यय करु नये यासाठी सोसायट्यांशी पत्रव्यवहार करावा. त्याबाबत जनजागृती करावी. त्यानंतर पाण्याचा अपव्यय करणा-यांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरुन पुढील दोन महिन्याच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही, अशी मागणी अमित गावडे यांनी केली आहे.














