- महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा केवळ ‘फार्स’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२४) :- शहरातून वाहणाऱ्या नद्यांची अवस्था खूपच गंभीर होत आहे. नद्यांची स्थिती बदलण्यासाठी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. हा प्रकल्प अजून कागदावरच आहेत. कागदावरून प्रकल्प अस्तित्वात येण्यापूर्वीच नद्यांचे अस्तित्त्व धोक्यात येत आहे. नदीच्या पात्रामध्ये राडारोडा व मातीचा भराव टाकून पात्र अरुंद करण्यावा प्रकार समोर आला आहे. काळेवाडी व चिंचवड येथे पवना नदीपात्रामध्ये दिवसाढवळ्या मातीचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत असून याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून सुमारे २५ किलोमीटर वाहणारी पवना नदी किवळे, रावेत येथून शहरात प्रवेश करते. वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, रहाटणी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी व दापोडी या भागांतून जाते. शहरात वाढणारे नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रामुळे पवना नदीच्या प्रदूषणात वाढ होत चालली आहे. सातत्याने नदीपात्रात मिसळले जाणारे मैलामिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक पाण्यामुळे नदीची गटारगंगा झाली आहे. असे असताना आता पात्रात भराव टाकून पात्र अरुंद करण्याचे काम सुरू आहे.
नदीपात्रात भराव टाकल्याने पावसाळ्यात अरुंद पात्रातून पाणी बाहेर येऊन महापूर येतो. पवना धरणक्षेत्रात अधिक पाऊस पडल्यास शहराच्या अनेक भागांमध्ये नदीचे पाणी शिरते. अनेकदा मोठे पूरही आले आहेत. अशी स्थिती असतानाही भराव टाकून पूरासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जात आहे.
नदी तीरावर अनेकांनी पूररेषेत अतिक्रमण केले आहे. पात्रात राडारोडा टाकून नदीपात्र बुजविले आहे. यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. कारवाईचा फक्त फार्स असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नदीपात्र अरुंद होत आहे.